रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज -२
(काळ साधारण सन 1970 ते 1973)
आम्ही एकूण नऊ सख्खी भावंडे, पाच बहिणी आणि चार भाऊ. त्यामध्ये मी सर्वात लहान, त्यामुळं सगळ्यांचच लाडक शेंडेफळ.
माझ्या काही भावंडात आणि माझ्यात अक्षरशः एका जनरेशनच अंतर होत. आता हेच बघा ना. जेंव्हा सगळे सांगत यमुताई माझी मोठी बहीण आहे. पण माझ्या बाल मनाला त्यावेळी काही बाळबोध प्रश्न हमखास पडत असत , ती बहीण आहे तर ती माझ्यापेक्षा एवढी मोठी कशी? तिची मुले माझ्याच वयोगटातली कशी?
तेंव्हा जास्तीत जास्त मी माझ्या पेक्षा सहा वर्षानी मोठा भाऊ मुकुंद दादा आणि तीन वर्षानी मोठी बहीण छाया माई यांनाच काय ती माझी भावंडं समजत होतो. कारण या दोघांबरोबरच समवयीन भावंडांप्रमाणे खेळण, दंगा-मस्ती, मारा-माऱ्या, एकमेकांना चिडवण,बोचकारण व्हायच. त्यात मी लहान असल्यामुळे सतत चिडवून घेण, मार खाण माझ्याच वाट्याला जास्त यायच तो भाग वेगळा.
त्यात पुन्हा मुकुंद दादा, आजऱ्यात तालुक्याच्या ठिकाणी शिकायला असल्यामुळे माझ्यावर दादागिरी करत सतत मला माझ्या गावंढळ बोलण्यावरून, वागण्यावरून चिडवायचा. सारख खुळ!, खुळा!! म्हणून हिणवायचा. असं चिडवून या दादा लोकांना काय आसुरी आनंद मिळतोय ते तेच जाणोत बिचारे. कारण अगदी तस्संच माझ्या दोन मुलांमध्येही त्यांच्या लहानपणी होत. माझा मोठा मुलगा शुभम, त्याच्या सहा वर्षांनी छोट्या असलेल्या भावाला, सोहमला अगदी अस्साच छळायचा. असो.
पण मी माझ्या सर्व भावंडात लहान असल्यामुळे या सो कॉल्ड दादागिरी करण्याच्या अनुभवापासून वंचित राहिलो हे माझे सुदैव की दुर्दैव मला माहीत नाही.
तर मुकुंद दादाच ते सततच चिडवणं माझ्या बालमनाला असह्य वेदना देणार व्हायच. पण एव्हढ्यावरच माझा हा त्रास संपत नव्हता पुन्हा त्याच ऐकून छाया माई आणि छोटी भाची सीमा पण त्याचीच री ओढायच्या. त्यावेळी मी अगदीच एकटा पडायचो. आणि माझा सात्विक संताप सातवं आसमान गाठायचा, पण मी बिचारा कांहीच करू शकायचा नाही. मग असहायपणे, हिरमुसला होऊन, रडत आई कडे धाव घ्यायचो. मग आई त्यांना दटावल्यासारखं करत, "तुला चिडवणाऱ्यांची आणि त्रास देणाऱ्यांची आपण उन्हात घरं बांधूया". अस नेहमीचच गुळमुळीत आश्वासन देत माझी कशीबशी समजुत काढायची.
मात्र या उलट बाकीची माझी मोठी भावंड, माझी भावंड कमी आणि पालक च जास्त होती. जसे की मारुती दादा ,विठा ताई,भुजंग दादा तसेच लग्नाला आलेल्या माझ्या मोठ्या बहिणी आक्काताई आणि बायाक्का. या दोघी तर मला पोटच्या मुलाच कराव इतक करायच्या. त्यांच ते मला प्रेमान आंघोळ घालन, आंघोळीचा शेवटचा तांब्या डोक्यावरून ओतताना “म्हातारा हो! “ म्हणुन आशीर्वाद देण, पावडर लाऊन कपाळावर आणि गालावर काजळाची तिठ लावण, खायला गुरगुटा दूध-भात करून भरवण, माझ दुखल खुपल बघण, माझ छोट्या-मोठ्या गोष्टी वरुण कौतुक करण ,सतत लाड लाड करण, काखेत घेऊन गावभर भाऊबंद-नातेवाईकांकडे सणा-समारंभाना फिरवून आणण. असे जरा प्रमाणा पेक्षा जास्तच लाड करायच्या. हे मला अजूनही लख्ख आठवतंय. आणि या अतिलाडाचा परिणाम म्हणून की काय नकळतपणे, मी कौतुकान तोंडाचा चंबू करून लाडीक - लाडीक बोलायला शिकलो होतो. हट्टी झालो होतो.
कधी बहीणीं किंवा आई सोबत आजऱ्याला जाण व्हायच तेंव्हा आजऱ्याच्या आत्याची माझ ते लाडीक-लाडीक बोलण ऐकून चीड-चीड व्हायची. मग याबद्दल आईला आणि बहिणींना तिच्या तोंडच्या तोफखान्याला सामोरं जाव लागायच. तिच ऐकून घ्याव लागायच. “काय गं ! सुध्या चा नुसता लाडोबा करून ठेवलाय तुम्ही मायलेकींनी. अशान त्याला खुळ करून टाकाल सगळ्याजणी मिळून". त्याला आता तरी शाळेत टाका! काय घरातच घेऊन बसणार आहात?”. असं आणि बरंच कांही..
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे

No comments:
Post a Comment